आमची दक्षिण भारताची सहल भाग ३
संपूर्ण सहली मध्ये प्रत्येक प्रवासात आमच्या बरोबर एक जोडगोळी होती ती म्हणजे माझा भाऊ आणि माझा एक मामे भाऊ. आम्ही जेव्हा जेव्हा रेल्वेने प्रवास एका तेव्हा हे एकच बर्थ वर झोपले . कन्याकुमारीला असताना माझ्या दोन मामींनी माझी एक गोष्ट ऐकली ती म्हणजे जीन्स घाला असे मी त्यांना सांगितले तर मामींनी ते मान्य केली आणि त्यांनी जीन्स घातली. मला खूप आनंद झाला. मग सगळे लवकर आवरून देवी कन्याकुमारीच्या दर्शनाला गेलो. नुकतीच तिची पूजा झाली होती. देवीचे सात्विक रूप खूपच विलोभनीय आहे. सुवर्णालंकार तिच्यावर शोभून दिसत होते. माझे लक्ष वेधले ते मात्र तिच्या नथेमध्ये असणाऱ्या हिऱ्याने. शेजारीच लावलेली समाईची ज्योत त्या हिऱ्याला स्वतःचे अस्तित्व सिद्ध करायला मदत करत होती. ते हिऱ्यामुळे देवीच्या चेहर्यावरील तेज किती तरी पटीने वाढलेले मला जाणवले. देवीचे दर्शन घेऊन आम्ही रॉक टेम्पल बघण्यासाठी निघालो. कन्याकुमारी देवीच्या मंदिरा बाहेरूनच तिथे जाण्यासाठी बऱ्याच लॉन्च आहेत. ती सोय खरच उत्तम आहे. आम्ही सगळे लॉन्च ने रॉक टेम्पल ला गेलो. एका संपूर्ण खडकावर केलेले ते बांधकाम मला खूप मनापासून आवडले. स्वामी विवेकानंदांची ती भव्य मूर्ती डोळ्याचे पारणे फेडणारी आहे हे नक्की. या भव्य शिळेवर बसून त्यांना त्यांच्या जीवनाचे लक्ष्य सापडले होते. या रॉक टेम्पल ची निर्मिती ही एकनाथ रानडे यांच्या मुळे झाली असे म्हणता येईल. त्या मंदिराच्या पायऱ्यांवर बसून मनाला जो एक प्रकारचा गारवा मिळाला त्याचे काय वर्णन करू मी..... निःशब्द मी.... हा माझ्या जीवनातील एक अविस्मरणीय असा अनुभव आहे. बराच वेळ तिथे आम्ही सोबत होतो आम्ही सगळे जाम खुश होतो. तिथे मी माझ्या तीन मामांसोबत एक फोटो काढला. जो माझा अमूल्य ठेवा आहे. तिथून आम्ही कन्याकुमारी मध्ये परत येऊन पुढच्या प्रवासाला म्हणजे अर्थात त्रिवेंद्रम ला जाण्यासाठी रेल्वे स्टेशन वर आलो. गाडी आमची २ वाजता ची होतो. तिथे आलो आणि थोड्या वेळात समजले गाडी लेट आहे. जरा वेळ टाईमपास करून नंतर आम्ही सगळे चक्क स्टेशन वर आधी जोडसाखळी आणि मग खो खो खेळलो. जाम मज्जा आली. पर प्रांतात जाऊन जिथे आपली भाषा कोणाला नीट माहीत नाही तिथे आपले खेळ खेळताना जो काही मनस्वी आनंद झाला काय वर्णू मी तो अनुभव. व्वा! बस एवढेच म्हणते. तिथून आम्ही त्रिवेंद्रम ला पोहोचलो संध्याकाळी तिथल्या समुद्र काठी एक फेरफटका मारून आम्ही जेवून सगळे लवकर झोपलो. खेळून सगळेच दमले होते ना..... दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर तिथल्या प्रसिद्ध मंदिर बघितले पद्मनाभ मंदिर. पण तिथे एक गंमत झाली. पुरुषांनी लुंगी घालूनच मंदिरात जायचे. तसेच स्त्रियांनी ही तिथल्या प्रथे प्रमाणे साडी अथवा घागरा अर्थात तिथे त्याला half सारी असे म्हणतात ते घातले तरच प्रवेश अन्यथा नाही. झाले आता आली का पंचाईत? एकच मामी तेवढी साडी नेसली होती बाकी कोणी नाही. आम्ही पंजाबी ड्रेस घातले होते. आजी तर नऊ वारी साडीत च असते नेहमी. मग काय आम्ही सर्व जणींनी सगळ्यांनी लुंगी भाड्याने घेतली ती ड्रेस वर गुंडाळली आणि दर्शनासाठी मंदिरात गेलो. दर्शन झाले आणि सकाळी १० वाजताची परतीची रेल्वे पकडून आम्ही ३६ तासांचा प्रवास करून दुसऱ्या दिवशी रात्री नागपूर ला सुखरूप परत आलो. या संपूर्ण प्रवासात आम्ही सगळी भावंडं एकत्र होतो. मज्जा, मस्ती, शिस्त, आणि आनंद सगळ्या गोष्टी आम्ही एकत्रितपणे अनुभवल्या. आजीही आमच्यात छान मिसळली होती. तिनेही सगळ्या गोष्टींचा आनंद घेतला. आणि शेवटी माझे सर्व मामा आणि सर्व माम्या यांना मनापासून धन्यवाद. त्यांच्या मुळे मला जीवनातील हा आनंद लुटता आला. अशा प्रकारे आमची सहल सुफळ संपूर्ण झाली.
©kkdhanashree
Comments
Post a Comment