आहुपे मधील गोलमेज परिषद
आपल्या, हो आपल्याच, पुण्यातील काही मंडळी भ्रमंतीला निघाली की काही जणांचा सूर असतो की "काय ते तंगडतोडीला जायचंय. रविवारची पहाटेची झोप सोडायची, घरून निघायचे, घाट उतरायचा आणि तो घाट किंवा दुसरा एखादा घाट चढत परत वरती यायचे. ही तंगडतोड सांगितली कोणी? यात काय सुख मिळणार आहे?" अशा लोकांचे काय करायचे, त्यांना काय उत्तरे द्यावीत, त्यांना सुखाची व्याख्या काय सांगावी यावर चर्चा करण्यासाठी एक गोलमेज परिषद ज्ञानप्रबोधिनीच्या पालकांनी आहुपे घाटात आयोजित केली होती. घाट पुणे शहरापासून थोडा लांब. त्यामुळे मंडळी पहाटे साडेचारलाच पुण्यावरून निघाली. भारत सरकारने संविधानात वजा २० अनुच्छेदात नमूद केल्याप्रमाणे यावेळीही वाहन चालक शुमाकरच होता. पण त्याचे कौशल्य बघायला जनता जागी राहिली नाही. त्यामुळे तो थोडासा नाराजच झाला होता. तरीही त्याने वेळेत आहुपे घाटाच्या सुरुवातीला सर्वांना सुखरूप सोडले. झोपेतून उठल्यावर डोळे उघडल्यावर समोर हिरवाईने नटलेला प्रदेश, श्रावणात नेहमी प्रमाणे डोंगरांना भेटण्यासाठी खाली आलेले ढग, शेतातील डोलणारी पिके हे बघण्याचे सुख काही निराळेच. हे कमी की काय पण हे बघता बघता वेळे...